प्रवीण गोंगले /चंद्रपूर /--
चंद्रपूर जिल्ह्यातील वाळू माफियांची दादागिरी अत्यंत हिंसक पद्धतीने पुढे आली आहे. चंद्रपूर जिल्हा मुख्यालयाशेजारी असलेला घुग्गुस हा औद्योगिक परिसर आधी कोळसा तस्करीने व आता वाळू तस्करीने रक्तरंजित झाला आहे. या भागातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या नकोडा गावच्या उपसरपंचाची रविवारी दिवसाढवळ्या रेतीघाट परिसरात माफियांनी बोलावून हत्या केली. या घटनेने चंद्रपूरचे राजकीय वर्तुळ हादरले असून या वाळू माफियांना भक्कम राजकीय संरक्षण असल्याचे बोलले जात आहे.
नकोडा. चंद्रपूरच्या शेजारी असलेल्या घुग्गुस औद्योगिक परिसरातील एक महत्वाचे गाव. कोळसा खाणी आणि सिमेंट प्रकल्प यामुळे हे गाव अल्पावधीत श्रीमंत झाले आहे. त्यातच वाळू आणि कोळसा माफियांनी गावात शिरकाव केल्याने गावात सतत अशांतता आहे. बारमाही वाहणारी वर्धा नदी या गावालगत वाहते. या नदी किना-यावरून होणारी वाळूची तस्करी म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी. या गावचे उपसरपंच मोहम्मद आरिफ शेख - ३० यांनी वाळू तस्करीचा विरोधं केला. त्यांना गेले काही दिवस सतत धमक्या मिळत होत्या. या धमक्यांची माहिती त्यांनी एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी , स्थानिक पोलिस ठाणे आणि संबंधित विभागांना दिली. आज रविवारी दुपारी ते घरी असताना त्यांना तातडीने वाळू घाटावर येण्याचा संदेश मोबाईलवर मिळाला. त्यानुसार ते घाटावर पोचले. मात्र तिथे आधीच उपस्थित असलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करत त्यांची हत्या केली. काही वेळाने उपसरपंच मोहम्मद आरिफ शेख यांच्या घरी या घटनेची माहिती दिली गेली. या नंतर पोलिसांनी घटनास्थळी पोचत मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला. घुग्गुस भागातील काही राजकीय व्यक्ती आणि वाळू माफिया यांनी आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप मृतकाचे वडिल मोहम्मद हनीफ शेख यानी केला आहे.
दरम्यान आधीच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने डोकेदुखी असलेल्या घुग्गुस भागात नजीकच्या काळातील ही आणखी एक राजकीय हत्या आहे. आधीच्या हत्यात कोळसा माफियांचा सहभाग होता तर ताज्या घटनेत वाळू माफियांचा संबंध आहे. त्यामुळे अत्यंत संवेदनशील असलेल्या या भागातून मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांनी आणि नागरिकानी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली. जोवर आरोपींना अटक होत नाही तोवर मृतदेहाचा पंचनामा नाही अशी भूमिका मृतक उपसरपंचाच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. संताप अनावर झालेले कुटुंबीय आणि माफिया टोळ्यांचा घटनेशी असलेला संबंध लक्षात घेता रुग्णालयात मोठ्या संख्येत पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अत्यंत सावध भूमिका घेत आहेत.
उपसरपंच मोहम्मद आरिफ शेख यांच्या हत्येला माफिया टोळ्या जबाबदार आहेतच मात्र घुग्गुस परिसरातील या टोळ्यांना असलेले राजकीय संरक्षण पोलिसांसाठी अडचणीची बाब ठरली आहे. त्यातही काही माफिया टोळ्या थेट भाजपशी सलगी करणा-या असल्याने मोहम्मद आरिफ शेख यांचे खरे मारेकरी तातडीने पकडले जातील कि नाही यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या हत्येने घुग्गुस क्षेत्र पुन्हा एकदा अशांततेच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे.......
Post a Comment