नवी दिल्ली : येणाऱ्या नवीन वर्षात फेबुवारी ते मार्च या कालावधीत एकाचवेळी उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये २०१७ची विधानसभा निवडणूक घेतली जाईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून २०१२ मध्ये पंजाब आणि मणिपूर राज्यांमध्ये ३० जानेवारीला, तर इतर राज्यांमध्ये फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्च या कालावधीत निवडणूक झाली होती.
संसदेत १ फेब्रुवारी २०१७ या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यानंतर या पाच राज्यांमधील निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येईल. यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाला निवडणूक आचारसंहितेचा अडथळा होणार नाही, असे निवडणूक आयोगाने प्रतिपादन केले आहे.
केंद्र सरकार आगामी वर्षापासून अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीऐवजी १ फेब्रुवारीला सादर करणार आहे. परिणामी निवडणुकांचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. सरकारने यासाठी निवडणूक आयोगाशी चर्चा केली होती. आयोगानेही १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यास आपला कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतरच पाच राज्यांमध्ये निवडणुका होतील, हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे.

Post a Comment