यवतमाळ –
येथील अभ्यंकर कन्या शाळा, राणी लक्ष्मीबाई माध्यमिक शाळा आणि नेर येथील दी इंग्लिश हायस्कूल येथे हिंदु जनजागृती समितीच्या कु. माधवी चोरे यांनी २ सहस्र ४०० विद्यार्थ्यांपर्यंत ३१ डिसेंबरच्या संदर्भातील विषय पोचवून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. या वेळी त्या म्हणाल्या, छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी रक्त सांडून आणि प्राणांचे बलीदान देऊन ज्या किल्ल्यांचे रक्षण केले त्या किल्यांवर मद्य मेजवान्या करून आपण त्या रक्तावर पाणी सोडत आहोत, ही त्यांच्याप्रतीची मोठी कृतघ्नता आहे.
येथील एका शाळेमध्ये आठवड्यातून एकदा धर्मशिक्षणवर्ग घेण्याची, तर एका शाळेत क्रांतिकारकांचे प्रदर्शन लावण्याची मागणी करण्यात आली. देशमुख नर्सिंग महाविद्यालयाने विषय मांडण्याची विनंती केली. दर्डा शारीरिक शिक्षण संस्थेचे प्राचार्य म्हणाले अशी निवेदने आम्हाला देत चला. तुमचे कार्य पुष्कळ चांगले आहे. आम्हाला नवीन काही असल्यास सांगा, असे सांगितले.
प्रशासकीय अधिकार्यांनीही निवेदनांना सकारात्मक प्रतिसाद दिला, तर पोलीस अधिकार्यांनी ३१ डिसेंबरच्या मोहिमेत सहकार्य करू, असे सांगितले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ डिसेंबरच्या संदर्भात प्रबोधन करणारी १४० भित्तीपत्रके चौकांत आणि देवळांत लावण्यात आली, तसेच समाजात १ सहस्र हस्तपत्रके वितरित करण्यात आली. ८ पोलीस ठाण्यांत, ४ प्रशासकीय अधिकार्यांना, ३ लोकप्रतिनिधींना, २३ खाजगी शिकवणीवर्गांत, ३२ शाळांमध्ये आणि १६ महाविद्यालयांत नववर्ष ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करा या संदर्भातील निवेदने देऊन प्रबोधन करण्यात आले. २० कार्यकर्ते आणि १० धर्माभिमानी यांनी मिळून २० दिवस हे अभियान राबवले.

Post a Comment