अवैध प्रवासी वाहतूक एसटीच्या मानगुटीवर - प्रवाशांचा जीव धोक्यात मात्र पोलीस प्रशासन बिनधास्त. परिवहन महामंडळाला लाखोंचा फटका:
Posted by
vidarbha
on
8:12:00 PM
in
चांदुर रेल्वे- (शहेजाद खान ) -
|
चांदुर रेल्वे- (शहेजाद खान ) -
चांदुर रेल्वे शहरातुन अमरावती, धामणगाव, कुऱ्हा, मालखेड, देवगाव मार्गावर व्हैन, काळी-पिवळी टॅक्सी, मेटाडोर हे वाहने विना परवाना अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या चांदुर रेल्वे आगाराला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. या प्रकरणास चांदुर रेल्वे पोलीस यंत्रणा व काही प्रमाणात राज्य परिवहन मंडळ कारणीभूत असल्याचे बोलल्या जाते.

चांदुर रेल्वे- अमरावती, चांदुर रेल्वे- कुऱ्हा, चांदुर रेल्वे- देवगाव, चांदुर रेल्वे- मालखेड या मार्गावर चालणाऱ्या व्हैन, काळी-पिवळी जीप, मेटाडोर या गाड्या प्रवाशांना कोंबून बिनधास्त चालत आहेत. परिवहन मंडळाच्या बसेस मात्र विना प्रवासी खाली जात असल्याचेही चित्र दिसत आहे. यामुळे परिवहन मंडळाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. परवानाधारक खाजगी गाड्यांनी वाहतुकीच्या परवान्यानुसार प्रवासी भरुन नेले तरी एसटीच्या उत्पन्नावर फारसा फरक पडणार नाही. परंतु विना परवाना खाजगी गाड्या सुद्धा प्रवासी जेवढे मिळतील तेवढे कोंबून भरुन नेताना दिसत आहेत. परिणामी राज्य परिवहन मंडळाच्या उत्पन्नावर निश्चितच फरक पडत आहे. मात्र या गंभीर बाबीकडे पोलीस यंत्रणा तसेच परिवहन मंडळातील वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. यावर पोलीस विभाग निर्बंध घालू शकतो. परंतु चिरीमिरीच्या लालसेपोटी अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. तसेच अमरावती बायपास रस्त्यावर वाहतुक पोलीस हे अवैध रेतीवाहतुक करणाऱ्या ट्रकांकडुन दररोज चिरीमिरी घेण्यासाठी बायपास शहर सोडुन केवळ बायपास रस्त्यावरच आपली ड्युटी बजावत असल्याची खमंग चर्चा सुरू आहे. अशातच नियमानुसार बस स्थानक परीसराच्या २०० मीटर अंतरावर कुठलेही खाजगी वाहन उभे करता येत नाही तसेच येथुन प्रवासी वाहतुक सुध्दा करता येता नाही. मात्र चांदुर रेल्वे पोलीसांच्या छत्रछायेत शहरातील बस स्थानकाला खासगी प्रवासी वाहतुकदारांचा गराडा पडलेला राहात असल्याने या वाहतुकदारांचे दलाल बस स्थानकातून प्रवासी पळविण्याचेही काम करतात. अवैध वाहतुकीच्या प्रवासाला बळी पडून प्रवासी वेळे अगोदर पोहोचण्याच्या घाईमुळे व्हैन, काळी-पिवळी गाड्यांतून प्रवास करुन जीव धोक्यात टाकत आहेत. मात्र या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे परिवहन मंडळाला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. याकडे पोलीस विभागाने लक्ष दिले तर परिवहन मंडळाच्या उत्पन्नात निश्चितच भर पडल्याशिवाय राहणार नाही..
Post a Comment