BREAKING NEWS

Monday, January 23, 2017

(म्हणे) ‘संविधान न मानणार्‍या सनातन संस्थेच्या विरोधात आमची लढाई आहे !’

अंनिसच्या चर्चासत्राचा फज्जा : केवळ ४० लोकांची उपस्थिती !

sanatan-virodh1
मुंबई– सनातन संस्था संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार आमच्यावर आरोप करते; मात्र त्यांना संविधान मान्य नाही. खुनशी आणि विद्वेषी भावनेतून धर्म सुधारण्याचे कार्य करणारी सनातन संस्था सामान्य माणसाच्या जिवावर उठली आहे.
 (धादांत खोटे आरोप करून सनातन संस्थेची नाहक अपकीर्ती करणारे अंनिसचे अविनाश पाटील ! सनातनला संविधान मान्य नाही, हे दाखवणारे एकतरी उदाहरण अविनाश पाटील यांच्याकडे आहे का ? उलट तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करण्यासाठी विखारी कायदा करू पहाणार्‍यांना वैध मार्गाने रोखून सर्वसामान्यांच्या श्रद्धेची जपणूक करण्याचेच कार्य सनातन संस्थेने केले आहे. धादांत खोटा आरोप करून अंनिसवालेच संविधानातील विचारस्वातंत्र्याचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे अंनिसवाल्यांवर कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! – संपादक)
डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येच्या अन्वेषणात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने २० जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत निदर्शने करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खून खटल्यातील प्रचंड विलंब : चिंतन, आकलन, विचारमंथन आणि धोरणनिश्‍चिती’, या विषयावर चर्चा करण्यासाठी १९ जानेवारीला मुंबई मराठा पत्रकार संघात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. महेंद्रसिंह, पत्रकार जतीन देसाई आणि कॉ. शरद कदम उपस्थित होते. (अंनिस सर्वत्रच्या साम्यवाद्यांना व्यासपिठावर स्थान देऊन विचार मांडायला देते. त्या वेळी या साम्यवाद्यांचे केरळमधील भाऊबंद हिंदूंच्या एकामागून एक हत्या करत आहेत, ते अंनिसवाल्यांना चालते आणि सनातनच्या साधकांवर केवळ संशय असल्यावरून अंनिस आकाशपाताळ एक करते. अंनिसचा हा दुटप्पीपणा जाणा ! – संपादक)
या चर्चासत्रात जवळपास सर्वच वक्त्यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले, तसेच संदर्भहीन टीका केली.

अविनाश पाटील यांचा कांगावा !

१. विचारांचा प्रतिवाद विचारांनी न करणार्‍या, प्रशासन आणि संविधान यांच्या विरोधात असणार्‍या सनातन संस्थेच्या विरोधात आमची लढाई आहे, अशी मुक्ताफळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी उधळली. (विचारांचा प्रतिवाद विचारांनी करणे सनातनला मान्य नसते, तर सनातनचे साधक आणि साधिका वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात कशाला सहभागी झाले असते ? हिंदु धर्मातील प्रथा आणि परंपरा यांवरील आघात किंवा त्यामागील शास्त्र, तसेच धर्माच्या संदर्भातील काही सरकारी निर्णय यांविषयी सनातनचे मत जाणून घेण्यासाठी वृत्तवाहिन्या आणि दर्शक उत्सुक असतात; म्हणून सनातनच्या प्रवक्त्यांना बोलावले जाते. प्रशासनातील भोंगळ कारभार, किंवा त्रुटी दाखवून देणे हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाचे कर्तव्यच आहे. त्यामुळे सनातन प्रशासनाच्या विरोधात आहे, असा अपप्रचार करणे कितपत योग्य आणि विवेकबुद्धीचे आहे ? सनातनने संविधानानुसार अंनिसच्या विरोधात न्यायालयीन दावे दाखल केलेलेसुद्धा अंनिसला चालत नाहीत. अशा अंनिसच्या अविनाश पाटील यांनी सनातनवर संविधानाच्या विरोधात असल्याचा आरोप करण्यापेक्षा स्वतः संविधानाचा आदर करायला शिकावे ! – संपादक)
२. अंनिसने केलेल्या आंदोलनांमुळे या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया चालू होऊन ते पुढे जात आहे. आतापर्यंत या प्रकरणात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचेच नाव आले आहे. सनातन संस्थेने पुढील हत्या कुणाची करायची याची सूची सिद्ध केली आहे. हत्या करण्याचे कट शिजवले आहेत. (हा जावईशोध अविनाश पाटील यांनी कोणत्या आधारावर लावला ? नक्षलवाद्यांशी संबंध असणार्‍या अंनिसला इतरांवर आरोप करण्याचा अधिकार आहे का ? सनातनवर बिनबुडाचे आरोप करणार्‍या अविनाश पाटील यांच्या या विधानांविषयी सनातन कायदेशीर समादेशन घेत आहे. – संपादक) अन्वेषण यंत्रणेतील काही अधिकार्‍यांनी आम्हाला हे वैयक्तिकरित्या सांगितले. (खोटी माहिती देणार्‍या अन्वेषण यंत्रणेतील अधिकार्‍यांची नावे उघड करण्याचे धाडस अंनिस दाखवणार का ? – संपादक)
३. संस्थेकडून सर्वसामान्यांमध्ये भय निर्माण करण्याचे काम चालू आहे. (असे असते, तर गोव्यातील रामनाथी येथील आश्रमात आणि पनवेल येथील आश्रमाला प्रतिदिन जिज्ञासूंनी भेटी दिल्या नसत्या, तसेच समाजातही सनातनच्या उपक्रमांना मिळणारा भरघोस प्रतिसाद मिळाला नसता. सनातनवर खोटे आरोप करण्यापलीकडे अंनिसवाल्यांकडे काही उपक्रमच नाही कि काय ? अशी शंका पाटील यांनी केलेल्या एकामागून एक खोट्या आरोपांवरून येते. – संपादक) असे असूनही सनातन संस्था उजळ माथ्याने फिरते. (कर नाही त्याला डर (भिती) कशाला ? – संपादक)
४. संस्थेचे प्रवक्ते मिजासखोरीने चर्चासत्रांत जाऊन वक्तव्ये करतात. (सनातनच्या प्रवक्त्यांना जाहीरपणे मिजासखोर म्हणणार्‍यांची मिजासखोरी किती असेल ? वैचारिक प्रतिवाद करू न शकणारेच अशी भाषा बोलतात. – संपादक )
५. अन्वेषण यंत्रणा नालायक नाहीत. त्या प्रयत्न करत आहेत; मात्र राजकीय दबावामुळे संस्थेवर कारवाई केली जात नाही. (अविनाश पाटील यांची मुक्ताफळे ! – संपादक)
६. सनातनच्या फरार साधकांचा ५ अन्वेषण यंत्रणा शोध घेत आहेत. नेपाळपर्यंत जाऊनही काहीच हाती लागले नाही, हे न पटण्यासारखे आहे. केवळ मारेकरी सापडून उपयोगी नाही, तर या हत्यांमागील खरा सूत्रधार, त्यांना आर्थिक साहाय्य करणारे यांच्यावरही कारवाई करायला हवी. (शासनाने कायदे आणि संविधान यांनुसार कारवाई करायची कि अंनिसच्या दबावानुसार कारवाई करायची ? संविधानावर कुणाचा विश्‍वास नाही, ते येथे स्पष्ट होते. – संपादक)
७. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर त्यांचे कुटुंबीय, अंनिसचे प्रमुख, समविचारी संघटनांचे नेते, पक्षप्रमुख यांची चौकशी झाली. आर्थिक गैरव्यवहारांमुळे हत्या झाली का, हेही पाहिले; मात्र हे पाहून मारेकरी मिळाला नाही. (त्या वेळी अन्वेषण यंत्रणांनी राजकारण्यांच्या दबावाखाली येऊन कारवाई केली नसेल, असा निष्कर्ष पाटील का काढत नाहीत ? अंनिसने बेकायदेशीररित्या परदेशातून कोट्यवधी रुपयांचा देणग्या गोळा केल्या आहेत. अनेक वर्षे ट्रस्टचे लेखापरीक्षण केलेले नाही. अंनिसने शासनाचा कर चुकवल्याचे सातारा धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या हत्येमागे आर्थिक गैरव्यवहारांचे कारण असू शकते, या दृष्टीने पुन्हा अन्वेषण व्हावे, ही हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अजूनही मागणी आहे. – संपादक)
८. अन्वेषण यंत्रणांकडे विचारांचा प्रतिवाद विचारांनी न करता हत्या करण्यात येते, ही दिशाच नसल्याने ते या दृष्टीने अन्वेषण करत नाहीत. (अविनाश पाटील यांची द्विधा मनःस्थिती यातून दिसून येते. आधी ते ‘अन्वेषण यंत्रणा नालायक नाहीत. त्या प्रयत्न करत आहेत’, असे म्हणतात, तर काही वेळाने अन्वेषण यंत्रणांना दिशाच नसल्याचा त्यांच्यावर आरोप करतात. – संपादक)

हिंदुद्वेष्ट्यांच्या कार्यक्रमाची दु:स्थिती

अविनाश पाटील यांच्या भाषणापूर्वीच अर्धे श्रोते निघून गेले !

सायंकाळी ५ वाजता चर्चासत्राची वेळ होती; मात्र प्रत्यक्षात ५.४० वाजता चर्चासत्राला प्रारंभ झाला. या चर्चासत्रासाठी अंनिसच्या वतीने समविचारी संघटनांचे कार्यकर्ते आणि पुरोगामी यांना निमंत्रित करण्यात आले होते. चर्चासत्राच्या शेवटी अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील बोलायला उभे राहिले, तेव्हा अर्ध्याहून अधिक श्रोते निघून गेले होते. (एकसारखे तेचतेच आणि बिनबुडाचे आरोप ऐकण्यात प्रेक्षकांनाही कंटाळा आला, तर त्यात नवल नाही ! – संपादक)

चर्चासत्र झालेच नाही, केवळ भाषणे ठोकून कार्यक्रमाची समाप्ती !

‘चर्चासत्र’ या नावाने कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र व्यासपिठावरील वक्त्यांनी भाषणे ठोकल्यावर कार्यक्रम समाप्त करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर उपस्थित भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यक्रमाचा मूळ विषय सोडून ‘भाजप आणि नोटाबंदी’, या विषयावर भाषण केले.

सनातनच्या साधकांचा ‘देशद्रोही’ म्हणून उल्लेख करून आरोपींची छायाचित्रे प्रसिद्ध !

या चर्चासत्राच्या ठिकाणी ‘वॉन्टेड’ असा मथळा देऊन सनातनच्या साधकांची छायाचित्रे लावण्यात आली होती. या भित्तीपत्रकांमध्ये ‘सारंग अकोलकर-कुलकर्णी-रूद्र पाटील, प्रवीण लिमकर, जयप्रकाश अण्णा या सनातनच्या साधकांचा ‘देशद्रोही’, असा उल्लेख करण्यात आला होता. (पोलिसांनी यावर कारवाई का केली नाही ? सनातनच्या कार्यक्रमांत अंनिसवाल्यांची आणि साम्यवाद्यांची देशद्रोही म्हणून छायाचित्रे प्रसिद्ध केली, तर शासनाला चालणार आहेत का ? याविषयी सनातन तक्रार करून कारवाईची मागणी करणार आहे ! – संपादक)

विरोधकांच्या हत्या, हाच इतिहास असणार्‍या साम्यवाद्यांची गरळओक !

१. (म्हणे) सनातनच्या आश्रमामधील मुख्य आठवले यांनी खून कसे करावेत ? याविषयी ‘मॅन्युअल’ काढले आहे ! : प्रकाश रेड्डी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष

सनातनच्या आश्रमामध्ये जे मुख्य आठवले बसले आहेत, त्यांनी खून कसे करावेत ? याविषयी मॅन्युअल काढले आहे. त्यामध्ये खून कसे करावेत ? खून करणे कसे योग्य आहे, ते धार्मिक सत्कृत्य कसे आहे, असे सांगितले आहे, असे वक्तव्य भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी यांनी केले. (असे आहे, तर हे ‘मॅन्युअल’ प्रकाश रेड्डी यांनी अन्वेषण यंत्रणांना अद्याप सादर का केले नाही ? यातूनच त्यांचा खोटारडेपणा दिसून येतो. अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ अहोरात्र झटणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विरोधात असे वक्तव्य करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा अश्‍लाघ्य प्रकार आहे ! सनातन संस्था रेड्डी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी अधिवक्तांचे समादेशन घेत आहे. – संपादक)
प्रकाश रेड्डी यांनी सनातनद्वेषातून मांडलेली अन्य सूत्रे !
१. सनातनच्या आश्रमांना टाळे लावले पाहिजे आणि आश्रम पूर्णपणे बंद झाले पाहिजेत, तरच हे बंद होईल. ही एकच संस्था नाही, तर आतंकवादी कारवाया करणार्‍या अशा अनेक संस्था आहेत. (सनातनवर बंदीसाठी साम्यवादी ज्यांचे सत्तेतील भागीदार आहेत, त्या काँग्रेसने प्रयत्न केले होते; पण तसे पुरावेच नसल्याने काँग्रेस तोंडघशी पडली आणि नंतर तिला सत्ताही गमवावी लागली. – संपादक)
२. यांचे उघड स्वरूप जनतेसमोर स्पष्टपणे आले आहे, तरी यांच्यावर कारवाई का होत नाही ? जे काय आहे ते स्वच्छ दिसते आहे. (सनातनचे स्वरूप कॉम्रेडवाल्यांना दिसते तसे नाही. सनातनद्वेषाची कावीळ झालेल्यांना सर्व पिवळेच दिसत असले, तरी ते प्रत्यक्षात तसे नसते. – संपादक)
३. सनातन संस्था काही आज उभी राहिलेली नाही आणि त्यांचे स्वरूपही आज उघड झालेले नाही. वर्ष २००९ ला झालेल्या मडगाव स्फोटात सरळसरळ सनातन संस्थेचे नाव आले. (मडगाव स्फोट प्रकरणी सनातनचे नाव कुठेच नाही. या प्रकरणात सनातन संस्थेला साधी नोटीससुद्धा आली नाही. केवळ राजकीय लाभासाठी काहींनी सनातनवर आरोप केले होते. जसे आजही होत आहेत. उलट मडगाव स्फोट प्रकरणात अटक झालेल्या सनातनच्या सर्व साधकांची निर्दोष सुटका करतांना न्यायालयाने ‘सनातन संस्थेला गोवण्याच्या उद्देशानेच या प्रकरणात प्रथमदर्शी अहवाल नोंदवला गेला आहे’, असा अन्वेषण यंत्रणांना फटकारणारा शेरा मारला आहे. प्रकाश रेड्डी यांनी हा निकाल संकेतस्थळावर तरी वाचावा ! – संपादक)
४. हे ‘सनातन संस्थेचे साधक आहेत’, असे लिहून डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या खुनातील आरोपींची चित्रे सर्वत्र लावली पाहिजेत. (चिथावणीखोर आणि प्रक्षोभक वक्तव्ये केल्याविषयी पोलीस प्रकाश रेड्डी यांच्यावर कारवाई करतील का ? – संपादक) यांचे सामाजिक स्वरूप शासनानेच उघड केले पाहिजे. (केरळ येथे राजरोसपणे संघ आणि भाजपचे कार्यकर्ते यांची हत्या करणार्‍यांचीही अशीच चित्रे लावून ‘हे साम्यवादी आहेत’, असे फलक लावायचे का ? – संपादक)

२. (म्हणे) ‘सनातन संस्था, संघ आणि शासन यांची मिलीभगत बाहेर आणण्याची आवश्यकता !’ :  जतीन देसाई, पत्रकार


यापुढे आमदार, खासदार यांच्या घरांपुढे निदर्शने करून आपले आंदोलन व्यापक केले, तरच लोकांच्या लक्षात येईल. सनातन संस्था, संघ आणि शासन यांची मिलीभगत बाहेर आणण्याची आवश्यकता आहे. (जतीन देसाई यांनी हा निष्कर्ष कोणत्या आधारावर काढला कि साम्यवादी आणि अंनिसवाल्यांच्या संपर्कात राहून तेही खोटारडेपणा अन् बिनबुडाची वक्तव्ये करायला शिकले ? अशा पत्रकारांमुळेच पत्रकारिता रसातळाला गेली आहे. – संपादक)

विशेष आभार / दैनिक सनातन प्रभात वृत्तपत्र व संकेतस्थळ 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.