BREAKING NEWS
Showing posts with label बुलडाणा-. Show all posts
Showing posts with label बुलडाणा-. Show all posts

Monday, May 8, 2017

जीएसटी कायद्याविषयी जनजागृतीपर कार्यशाळा

बुलडाणा-

 कर व सेवा कर जनजागृती कार्यशाळा नुकतीच विक्रीकर कार्यालय खामगांव यांच्यावतीने चिखली व मलकापूर येथे संपन्न झाली. चिखली येथे जवाहर अर्बन बँकेच्या सभागृहात, तर मलकापूर येथे मलकापूर अर्बन बँकेच्या गोळवलकर गुरूजी सभागृहात पार पडली.
मलकापूर येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलकापूर शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मख्खनलाल मुंदडा व प्रमुख उपस्थितीत विक्रकर उपायुक्त टी. के पाचरणे होते. तसेच चिखली येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखली शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. बाहेती, तर प्रमुख उपस्थितीत सहायक विक्रीकर उपायुक्त डॉ. पी. बी राठोड होते.
कार्यशाळेत जीएसटी कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक विक्रकर विभागाच्या अधिकारी यांनी केले. या कायद्यातील तरतूदींविषयी माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली. तसेच पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे कायद्याच्या महत्वाच्या तरतूदी विक्रीकर निरीक्षक यु.एस देशमुख, जी.एस अवचार व आर.एच बोराळे यांनी सांगितल्या. प्रमुख मार्गदर्शन एम.एम खुणे, डी. जे पाटील यांनी केले. यावेळी व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यशाळेला मोठ्या संख्येने व्यापारी व कर सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Monday, May 1, 2017

जिल्ह्याला समृद्ध करण्यासाठी सर्वांनी विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी

• राज्याचा 57 वा स्थापना दिवस थाटात
• जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 1 हजार 528 कामे पूर्ण 
• जिल्ह्यात 4 लक्ष 4 हजार 912 मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण
• उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानातंर्गत कृषि यांत्रिकीकरणासाठी मोहिम

बुलडाणा-

 राज्य शासन विविध विभाग व अनेक योजनांच्या माध्यमातून जनतेचे कल्याण साधण्याचे काम करीत असते. यामध्ये जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत घटकांचादेखील सहभाग असतो. शासन राबवित असलेल्या योजनांमध्ये लोकसहभागही तितकाच महत्वाचा असतो. जिल्ह्याला या योजनांच्या माध्यमातून समृद्ध करण्यासाठी सर्वांनी विक्रास प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले. 
महाराष्ट्र राज्याचा 57 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार विजयराज शिंदे, नगराध्यक्षा श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षष्मुखराजन, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदींची उपस्थिती होती. 
जिल्ह्यात उद्भवत असलेल्या पाणीटंचाईवर यशस्वीरित्या मात करण्यात येत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता सर्वदूर जाणवत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने नागरिकांना मुबलक व पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना करून पाणीटंचाईवर मात करण्याचे यशस्वी नियोजन केले आहे.गत खरीप हंगामात तूरीचे प्रचंड उत्पादन झाले. तूरीला खाजगी व्यापाऱ्यांकडून किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी मिळत असलेला दर बघता बळीराजाचे नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने नाफेडमार्फत तूरीची शासकीय खरेदी केली. नुकतेच राज्य शासनाने 22 एप्रिल पर्यंत नोंद झालेल्या संपूर्ण तुरीची खरेदी करावयाचा निर्णय घेतला असून खरेदीला सुरूवातही झाली आहे. 
ते पुढे म्हणाले, या खरीप हंगापासून राज्यभर ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून तालुका हा कृषि विकासाचा घटक निश्चित करण्यात आला असून कृषि यांत्रिकीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेत जमिनीचे आरोग्य समजून त्याप्रमाणे पीक घेता यावे, यासाठी मृद आरोग्य पत्रिका वितरण अभियान सुरू आहे. जिल्ह्यात 2016-17 मध्ये 60 हजार 875 मातीच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून 4 लक्ष 4 हजार 912 आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. 
खरीप हंगामात 7.48 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून त्यामध्ये सोयाबीन व कापूस पिकांचे क्षेत्र जास्त आहे. जिल्ह्यासाठी सोयाबीनच्या 1.15 लक्ष क्विंटल व कापसाच्या 8.5 लक्ष बियाणे पाकिटांचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामात प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज मिळण्यासाठी गतवर्षीपेक्षा जिल्ह्याचे कृषि कर्जाचे उद्दिष्ट 93 कोटी रूपयांनी वाढवून 1458 कोटी रूपये निश्चित करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी संबंधित बँक शाखेत जावून नवीन कर्जासाठी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
भूजल पातळी जलयुक्त शिवार अभियान यशस्वी ठरत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, भूजल पातळी वाढवून मोठ्या प्रमाणावर संरक्षित सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. गतवर्षी निवडलेल्या 245 गावांमध्ये 1 हजार 528 कामे पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध उपचारांमुळे 1292 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. तसेच 1292 हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. राज्यात शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचन संच खरेदी करण्यासाठी ई-ठिबक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करून सुक्ष्म सिंचन संच खरेदी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
ते पुढे म्हणाले, सौर उर्जेवर आधारीत 339 कृषि पंप जिल्ह्यात कार्यान्वीत झाले आहे. हे पंप वापरून शेतकरी सिंचन करीत आहे. त्याचप्रमाणे कृषि पंपासाठी सन 2016-17 मध्ये जिल्ह्यात 7 हजार 499 शेतकऱ्यांना जोडण्या देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 12 नवीन 33 के.व्ही क्षमतेची उपकेंद्र निर्माण करण्यात आली असून 344 किलोमीटर लघु दाब वाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत प्रत्येक बेघराला हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात या योजनेतून 4 हजार 60 घरकूलांचे कामे सूरू असून 2 हजार 843 घरकूलांचे बांधकाम पुर्ण झाले आहे. मुलींचे घटते प्रमाण अत्यंत चिंताजनक असून स्त्री भ्रृण हत्या रोखण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. केवळ सरकारी उपाययोजनांच्या माध्यमातून हे काम होणार नसून सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थांनी सामाजिक भावनेने याबाबत काम करणे गरजेचे आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानातून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जाणीव-जागृती करण्यात येत आहे.
स्वच्छ भारत अभियानात सर्वांनी हिरीरीने सहभाग घेण्याचे आवाहन करीत जिल्हाधिकारी म्हणाले, स्वच्छ भारत मिशन जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. वैयक्तिक शौचालयांच्या निर्मितीमध्येही जिल्ह्याने भरारी घेतली आहे. जिल्ह्यात 3.70 लक्ष कुटूंबांपैकी 2.26 लक्ष कुटूंबाकडे शौचालय आहेत. प्रत्येकाने व्यक्तीगत स्वच्छता पाळून स्वच्छ भारत अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे.
कार्यक्रमाचे संचलन नरेंद्र लांजेवार व श्रीमती अंजली परांजपे यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण पुरस्कार प्राप्त, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी यांनी परेड निरीक्षण केले. कमांडर आर.आर वैजने यांनी जिल्हाधिकारी यांना सलामी दिली. तसेच महिला पोलीस दल, होमगार्ड पुरूष व महिला दल, बँण्डपथक, श्वानपथक, रूग्णवाहिका व नगर पालिका अग्नीशमन वाहन यांनी परेडमध्ये सहभाग घेतला.

Wednesday, April 26, 2017

नुतन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्वीकारला पदभार

बुलडाणा-

 जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांची क्रीडा आयुक्त या पदावर बदली झाल्यामुळे जिल्हाधिकारी पदावर डॉ. चंद्रकांत लक्ष्मणराव पुलकुंडवार यांची नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या पदाचा पदभार आज 26 एप्रिल 2017 रोजी स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना पदाची सूत्रे दिली व जिल्हाधिकारी यांच्या खूर्चीत बसविले.
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची 18 जून 1993 रोजी उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासनात नियुक्ती झाली. त्यांनी परिविक्षाधीन कालावधीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे तहसीलदार व राळेगांव येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले. तसेच जिल्हा पुनर्वसन अधिकारी पदावरही त्यांनी यवतमाळ येथे काम केले. अमरावती जिल्ह्यात धारणी येथे 1995 ते 1997 मध्ये उपविभागीय अधिकारी, 1999 पर्यंत विशेष भूसंपादन अधिकारी कृष्णा खोरे जालना, त्यानंतर उपविभागीय अधिकारी वसमत जि. हिंगोली, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेत उपायुक्त, 2002 ते 2004 दरम्यान निवासी उपविभागीय अधिकारी नांदेड, त्यानंतर उपविभागीय अधिकारी परभणी, अंधेरी मुंबई येथे एमआयडीसीमध्ये भूव्यवस्थापक, ठाणे जिल्ह्यात महापे एमआयडीसीला क्षेत्रीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी अंधेरी, 2008 ते 2010 दरम्यान मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, 2010 ते 2014 मध्ये आरोग्य मंत्री यांचे खाजगी सचिव, 15 डिसेंबर 2014 ते 5 सप्टेंबर 2015 पर्यंत अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, 30 एप्रिल 2016 पर्यंत उप संचालक भूमी अभिलेख पुणे या पदावर कार्य केले आहे.
तसेच त्यांना 29 मार्च 2016 रोजी आयएएस म्हणून पदोन्नत करण्यात आले. आयएएस म्हणून पहिली नियुक्ती गोंदीया जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झाली. त्यानंतर बुलडाणा जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील आहे. त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे पशु विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली. तसेच पदव्युत्तर पदवी पशुविज्ञान (रोगचिकित्सा) शाखेत मिळविली.
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पदाची सूत्रे स्वीकारत माजी जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांना पुढील जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
शासनाने ‘फ्लॅग शिप’ उपक्रम प्रभावीपणे राबविणार – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
शासनाचे प्राधान्यक्रम असलेले जलयुक्त शिवार, शासकीय तूर खरेदी, शेतकरी आत्महत्या नियंत्रण, सेवा हमी कायदा, सिंचन विहीरी, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ- बेटी पढाओ आदी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील. जिल्ह्यातील प्रशासनाला गती देवून ऑनलाईन सेवांवर भर देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या 7/12 चे संगणकीकरण करण्यात आले असून शेतकऱ्याला ऑनलाईन 7/12 देण्यात येईल. सर्वांना सोबत घेवून प्रशासन गतिमान करण्याचा प्रयत्न केल्या जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत लक्ष्मणराव पुलकुंडवार यांनी पदभार स्वीकारताना सांगितले. 

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.