BREAKING NEWS

Saturday, April 1, 2017

जिल्हा विकासासाठी टिम भंडारा म्हणून काम करु - जिल्हाधिकारी श्री सुहास दिवसे • डॉ. अभिजीत चौधरी यांना निरोप : नवीन जिल्हाधिकारी रुजू

भंडारा:-   

शासनाच्या महत्वाकांक्षी योजना व कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यासाठी तसेच जिल्हयातील सामान्य माणसाचा विकास व्हावा यासाठी  टिम भंडारा म्हणून काम करु या, असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. मावळते जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासक म्हणून उत्तम काम केले असून त्यांचे नाविण्यपूर्ण उपक्रम या पुढेही सुरु राहतील, अशी ग्वाही सुहास दिवसे यांनी दिली.  सुहास दिवसे यांनी आज जिल्हाधिकारी भंडारा म्हणून कार्यभार स्विकारला.
डॉ. अभिजीत चौधरी यांना निरोप व सुहास दिवसे यांच्या स्वागताचा कार्यक्रम महसूल कर्मचारी यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. महसूल प्रशासनाच्या वतीने डॉ. अभिजीत चौधरी यांचा अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे यांनी शाल श्रीफळ देवून सत्कार केला. जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, अप्पर जिल्हाधिकारी प्रदीपकुमार डांगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर व निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे उपस्थित होते.
महसूल विभागातील प्रत्येक पदावर काम करण्याची संधी मिळाल्याचे नमूद करुन जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले की, विदर्भात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र वैदर्भिय माणसं प्रेमळ असल्याचा आपला अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. अभिजीत चौधरी यांनी आठ-नऊ महिन्याच्या काळात अतिशय चांगले काम केले आहे. त्यांनी राबविलेले नाविण्यपूर्ण उपक्रम यापुढेही सुरु राहतील, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी हा जिल्हयाचा प्रमुख असला तरी आपण सर्वांच्या सहकार्याने व सर्वांना सोबत घेवून भंडारा जिल्हयाच्या विकासाला गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निरोपाला उत्तर देतांना डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, भंडारा जिल्हयात जिल्हाधिकारी म्हणून पहिलीच पदस्थापना असली तरी जिल्हयाच्या विकासासाठी व शासनाच्या महत्वाकांक्षी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी मोलाची साथ दिली. गोसीखुर्द पुनर्वसन, नवोदय विद्यालयासाठी जागा, शंभर टक्के वसुली, जलयुक्त शिवार आदि कामे यशस्वीपणे करता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. टिम भंडारा म्हणून काम करतांना विकास हाच उद्देश ठेवला होता. कमी कालावधी मिळाला असला तरी सामान्य माणूस डोळयासमोर ठेवून काम केल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. अभिजीत चौधरी यांनी आपल्या प्रशासकीय कौशल्याने आपल्या कामाची छाप जिल्हयावर सोडली असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी सांगितले. समन्वयाने काम करण्यात त्यांचा हातखंडा होता असेही त्या म्हणाल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे म्हणाले की, जिल्हा परिषदेला त्यांचे नेहमी सहकार्य लाभले. शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरण यासाठी डॉ. चौधरी यांनी जिल्हा परिषदेला मार्गदर्शन व सूचना तसेच मदत केली आहे.
नवोदय विद्यालयासाठी जागा, महसूल कर्मचाऱ्यांची कालबध्द पदोन्नती, झुडपी जंगल, वन पट्टे, शंभर टक्के वसुली, वैनगंगेवरील जून्या पूलावरील वाहतूकीस बंदी, शंभर टक्के वसुली, गोसेखुर्द पुनर्वसन सुविधा, कर्मचाऱ्यांसाठी वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आदि कामे अभिजीत चौधरी यांनी यशस्वीपणे केल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात सांगितले. उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी. उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, तहसिलदार वरुणकुमार सहारे, धनंजय देशमुख, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किशोर राऊत यांची यावेळी  भाषणे झाली.
कार्यक्रमाचे संचालन अभिषेक नामदेव यांनी केले तर उपस्थितांचे आभार नायब तहसिलदार विनोद थोरवे यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.