यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसिलदार महेश सावंत, अश्विनी जाधव, मुंबई मॅरेथॉन विजेती धावपटू ज्योती गवते, प्रा अरूण भांगे तसेच अन्य मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल म्हणाले, सर्वांना मतदानाचा अधिकार समान असून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी शहरी व सुशिक्षित मतदार मतदानाबाबत उदासीन राहतात, ही नकारात्मकता बदलणे गरजेचे असून यासाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांत मतदानाबाबत जागृती करणे गरजेचे आहे. मतदार NOTA ( वरीलपैकी कोणत्याही उमेदवाराला मत नाही) या पर्यायाचाही वापर करू शकतात. प्रलोभनाव्दारे तसेच दबावाखाली येऊन मतदान करू नये. असेही जिल्हाधिकारी श्री महिवाल यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी (निवडणूक) महेश वडदकर म्हणाले, मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मतदान ही लोकशाहीची ताकद असते. मतदार जागृतीसाठी विविध महाविद्यालयांत मतदान हक्काविषयी व्याख्याने व परिसंवाद तसेच विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचेही श्री वडदकर यांनी सांगितले.
तहसिलदार महेश सावंत म्हणाले, मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. आपल्याला मिळालेल्या मतदानाच्या या अधिकाराव्दारे आपण योग्य व्यक्तीची निवड करुन लोकशाही सुदृढ, सक्षम व अधिक बळकट करु शकतो असेही श्री सावंत यांनी सांगितले.
मतदार यादीमध्ये पात्र मतदारांचा, विशेषतः युवकांचा समावेश व्हावा यासाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्यामार्फत तसेच स्थानिक स्तरांवर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदार याद्यांच्या पुनर्निरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येतो अशी माहितीही यावेळी देण्यात आली. सूत्रसंचलन प्रा सुनिल मोडक यांनी केले.

Post a Comment