BREAKING NEWS

Sunday, November 27, 2016

गोरेगाव ते जोगेश्‍वरी रेल्वेमार्गातील नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर हे नाव देण्याला राज्यशासनाकडून मान्यता !

नवीन रेल्वेस्थानकाचा फलक

प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडतांना वीर सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत श्री. निरंजन पाल
श्री. निरंजन पाल आणि वीर सेना यांच्या प्रयत्नांना यश !

    मुंबई- गोरेगाव ते जोगेश्‍वरी या रेल्वेस्थानकांच्या मध्यभागी होणार्‍या नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर हे नाव द्यावे, यासाठी वीर सेनेचे श्री. निरंजन पाल आणि वीर सेना मागील एक वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर हे नाव देण्याविषयी राज्यशासनाने मान्यता दिली आहे. याविषयी २५ नोव्हेंबर या दिवशी राज्यशासनाच्या गृहविभागाकडून जिल्हा प्रशासनाला अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभू या रेल्वेस्थानकाचे उद्घाटन आणि नामकरण करणार आहेत. नामकरणाच्या राबवलेल्या मोहिमेत हिंदु गोवंश रक्षा समिती; श्री शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळी आणि हिंदु जनजागृती समिती या हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून वीर सेनेला पाठिंबा देण्यात आला. 

निरंजन पाल यांनी चिकाटीने केलेले प्रयत्न

१. या रेल्वेस्थानकाला राम मंदिर हे नाव देण्यासाठी ऑक्टोबर २०१५ पासून श्री. निरंजन पाल वीर सेनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत होते. 
२. त्यांनी गोरेगाव रेल्वेस्थानक, बेस्ट कॉलनी, एम्.जी. रोड, राम मंदिर रोड आदी ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवली. या मोहिमेत ५ सहस्रांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षर्‍या करून नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर नाव देण्याला संमती दर्शवली. 
३. श्री. निरंजन पाल आणि वीर सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे खासदार श्री. गजानन कीर्तीकर, भाजपचे खासदार श्री. गोपाळ शेट्टी, राज्यमंत्री विद्या ठाकूर यांसह विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी यांना निवेदने दिली. या सर्वांनी केंद्रीय गृहमंत्री श्री. राजनाथ सिंह यांना पत्र पाठवून राम मंदिर नावाला सहमती दर्शवली. 
४. रेल्वेस्थानकाला राम मंदिर हे नाव देण्याला संमती देणारी अनेक पत्रे मिळवून श्री. निरंजन पाल यांनी २१५ पानांची धारिका सिद्ध केली. ही धारिका केंद्रीय गृहमंत्री श्री. राजनाथ सिंह, केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभू, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांसह अन्य लोकप्रतिनिधींना पाठवून श्री. निरंजन पाल यांनी जनतेची भूमिका त्यांच्यापुढे मांडून या आंदोलनाला बळकटी दिली. 
५. श्री. निरंजन पाल आणि वीर सेना यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळेच नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर नाव देण्याला लोकप्रतिधी आणि जनता यांचा पाठिंबा प्राप्त झाला. 
   विशेष म्हणजे या भागातील कोणत्याही पंथाकडून या नावाला विरोध दर्शवण्यात आला नाही. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणातही जनाधाराचे मत शासनाला कळण्यात आले होते. या भागात २५० वर्षे पुरातन श्रीराम मंदिर आहे, तसेच या भागालाही राम मंदिर रोड या नावाने ओळखले जाते. येथील रहिवासी त्यांच्या पत्त्यामध्ये राम मंदिर रोड, असा उल्लेख करतात. वीजदेयके, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र आदी शासकीय पत्रांवरही पत्ता देतांना राम मंदिर असा उल्लेख करण्यात येतो. अशा प्रकारे वस्तुनिष्ठ आणि अभ्यासपूर्ण सूत्रे मांडून श्री. निरंजन पाल यांनी नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर, असे नाव देण्याची भूमिका राज्य शासन, जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे यांच्यापुढे सातत्याने, चिकाटीने आणि ठामपणे मांडली. त्यामुळेच या नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर हे नाव संमत होणे म्हणजे श्री. निरंजन पाल आणि त्यांच्या वीर सेनेच्या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांचे यश, असे म्हटले जात आहे.


रेल्वेस्थानकाला राम मंदिर हे नाव देण्यामागील श्री. निरंजन पाल
आणि वीर सेना यांची राष्ट्रीयत्वाची भूमिका !

   नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर हे नाव देण्यामागे केवळ औपचारिकता नसून त्यामागे श्री. निरंजन पाल आणि त्यांच्या वीर सेनेची राष्ट्रीयत्वाची भूमिका आहे. मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांना आजही इंग्रजाच्या काळातील नावे आहेत. दास्यत्वाची प्रतीके असलेली ही नावे पालटून राष्ट्रपुरुषांची नावे असावीत, ही त्यामागील भूमिका आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.