पुणे –
भारतीय संस्कृतीमध्ये वेदाध्ययनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेद नवीन पिढीला समजावणे आणि आपली संस्कृती अबाधित राखणे, याचे कार्य वेदपाठशाळा करतात. भारतभरामध्ये अनुमाने ३०० वेदपाठशाळा असून त्या सर्वांना मिळून शासन वर्षाकाठी ८ कोटी रुपये अनुदान देते. एकूणच वेदपाठशाळांना शासनाकडून मदरशांइतके अनुदान मिळत नसल्याची खंत येथील वेदभवनचे प्रधान आचार्य वेदाचार्य मोरेश्वर घैसासगुरुजी यांनी व्यक्त केली.
वेदाचार्य घैसासगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘एकीकडे ही परिस्थिती असतांना वेदपाठशाळेतून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या मुलांना शुद्ध मंत्र उच्चारता येत नाही. यासाठी वैदिकांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. तसेच जे कोणी १५ वर्षे अभ्यास करून त्या विषयांत पारंगत होतात, त्यांना अध्यापनाची संधी न मिळाल्याने त्यांना समाजात पौरोहित्य करण्यावाचून पर्याय रहात नाही. त्यामुळे आज वेदज्ञान पौरोहित्यात अडकून पडले आहे. वेदशास्त्राचे एखादे विद्यापीठ असावे, यासाठी माझ्या वडिलांनी सातत्याने शासनाशी पत्रव्यवहार केला; पण त्याचा फारसा उपयोग न झाल्याने आम्ही प्रयत्न सोडून दिले.’’

Post a Comment