Sunday, April 9, 2017
12 एप्रिल ला पनवेल महानगर पालिकेवर भव्य मोर्चा-ग्रामपंचायती मधील 384 कामगारांचे वेतन अजूनही थकीतच
Posted by vidarbha on 9:09:00 AM in | Comments : 0
शहरांचे व्यवस्थापन आणि सुसहय जिवन यातूनच प्रशासकीय व्यवस्थापनाची निर्मिती होते आणि हयाच उद्देशाने दिनांक 01 ऑक्टोबर 2016 रोजी पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन पनवेल तालुक्यातील 29 गावातील 23 ग्रामपंचायतींचा पनवेल महानगरपालिकेत समावेश झाला.
हया समावेशनात 23 ग्रामपंचायतींच्या उत्पन्नाबरोबर ग्रामपंचायतींच्या बँक ठेवी तसेच ग्रामपंचायतींच्या सर्व स्थावर मालमत्तेचा कब्जा पनवेल महानगर पालिकेने केला, मात्र हया ग्रामपंचायतीत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या 384 कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेण्यास पालिकेने अनास्था दाखवीली. वास्तवीक पनवेल महानगर पालिका स्थापन करताना वा करण्यापूर्वी सदर ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत का विचार केला गेला नाही ? असा सवाल कर्मचाऱ्यांमार्फत विचारला जातो.
सदर बाबतीत आपणास न्याय मिळणे करीता कर्मचाऱ्यांनी म्युनीसीपल ईम्पलॉईज युनियन हया संघटनेचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर तसेच कार्याध्यक्ष् श्री. संतोष पवार व अनिल जाधव यांच्या वतीने पालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची दिनांक 09/02/2017 रोजी भेट घेऊन कर्मचाऱ्यांचे समावेशन व पगार अदा करण्या बाबत विनंती करण्यात आली होती, सदर भेटीत कर्मचाऱ्यांच्या पगारा व समावेशना बाबत लवकरच कमिटी स्थापन करुन सर्व कर्मचाऱ्यांना पगार अदा करण्यात येतील व समावेशन करण्यात येईल असे आश्वासन मा. आयुक्त श्री सुधाकर शिंदे यांनी दिलेले होते. तथापी निवडणूक आयोगाच्या मागणीनूसार त्यांची बदली झाली. सदर काळावधीस आजमितीस 6 महिन्यांचा कालावधी उलटला आहे, आणि सर्व कर्मचाऱ्यांचे पगारा बाबतचे व समावेशनाचे प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत.
6 महिन्यांपासून पगार मिळाला नाही म्हणून पूर्वाश्रमीचे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आपल्या संघटनेच्या वाटेवर चालून कोणतेही कामबंद आंदोलन केले नाही व पालिकेने दिलेल्या आदेशांचे पालन करण्यास नकार दिला नाही. परंतू सदर कर्मचाऱ्यांची महापालिकेस जरा देखील दया आली नाही.
6 महिने पगार न मिळाल्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे, आरोग्य विषयक उपचार घेणेतर दूरच, उधारीवर आणलेल्या किराणा मालाचे व्यापारी सकाळ संध्याकाळ कर्मचाऱ्यांच्या घरी पैशे मागण्यासाठी हजेरी लावीत आहेत, तर काहीकांना आपल्या विजेचे बिल न भरता आल्या कारणाने विद्युत कंपनीकडून विज कनेकश्नची कापनी करण्यात आली आहे. मुलांच्या शाळा सुरु झाल्याने त्यांचे शाळेय खर्च कश्या प्रकारे भागविणार अश्या अनेक समस्या कर्मचाऱ्यांसमोर आ वासून आहेत. दरम्यानच्या कालात काळूंद्रे ग्रामपंचायत येथील पाणीपुरवठा कर्मचारी श्री. अविनाश म्हात्रे यांची उपचारा करीता पैसे नसल्याने प्राणास मुकावे लागले, व मनुष्य हत्येचे पातक पनवेल महानगरपालिकेच्या माथी लागले. अशा एक ना अनेक समस्यांनी कर्मचारी ग्रस्त झालेले आहेत.
वर्षानुवर्ष स्वाभीमानाने जगणारा, कुणापुढे हात पुढे करण्याची गरज न पडणाऱ्या कर्मचाऱ्यावर आज पालिकेने लाचारीची अवस्था आणली आहे. तथापी नव्याने आयुक्तपदी विराजमान झालेले श्री. राजेंद्र निंबाळकर हे आपले प्रश्न सोडवून आपली वाताहात संपवतील हया आशेवर हे कर्मचारी होते परंतू त्यांच्या कडूनही निराशाच पदरी पडल्याने म्युनीसीपल ईम्पलॉईज युनियनच्या वतीने सर्व विभागीय अधीक्षकांना तात्काळ पगार मिळण्याबाबतची निवेदने देण्यात आलेली आहेत. सदर निवेदनाने प्रश्न मार्गी न लागल्यास व सर्व समोपचाराचे उपाय संपल्याने दिनांक 12 एप्रिल 2017 रोजी मोठया संख्येने पनवेल महानगरपालिकेवर मोर्चा तर दिनांक 14 एप्रिल 2017 हया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी पनवेल महानगरपालिका येथे कामबंद धरणे आदोलन करण्यात येईल असा इशारा कर्मचारी व संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment