BREAKING NEWS

Friday, March 17, 2017

प्रत्येकाने पाणी बचतीचा संकल्प करावा -जिल्हाधिकारी श्री सचिंद्र प्रताप सिंह


*जलजागृती सप्ताहाचे उद्‌घाटन
*सप्ताहभर विविध कार्यक्रम राबविणार
*कलश पुजन व जलरथाचे लोकार्पण


यवतमाळ-

पाणी निर्माण करता येत नाही. पाणी बचतीतूनच ते निर्माण होते. भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास फार मोठ्या संकटाला समोर जावे लागेल. त्यामुळे पाणी बचतीचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने पाणी संवर्धन, बचत व पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविण्याचा संकल्प केला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगराध्यक्ष कांचन चौधरी, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, जलतज्ज्ञ प्राचार्य अविनाश शिर्के, शंकर अमिलकंठावार, कृषि विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सी. यू. पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिल ठाकरे, प्रयासचे सुरेश राठी, कार्यकारी अभियंता श्री. बारापात्रे आदी उपस्थित होते.
प्रत्येकाने पाण्याची काटकसर करून बचतीचा मार्ग अवलंबिला पाहिजे. जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरल्यास पाणी पातळी वाढून पिण्याच्या पाण्यासह शेतकऱ्यांना सिंचनासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. लोकांमध्ये जलसंवर्धनाबाबत जनजागृतीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी प्राचार्य श्री. शिर्के आणि शंकर अमिलकंठावार यांनी जलबचतीबाबत मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष श्रीमती चौधरी, डॉ. पाटील, डॉ. ठाकरे यांच्यासह वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचेही यावेळी भाषण झाले.
प्रास्ताविक श्री. काटपल्लीवार यांनी केले. सुरवातीस दिपप्रज्वलानासह जिल्ह्यातील प्रमुख नद्या असलेल्या अरूणावती, निर्गुडा, बेंबळा, अडाण, निळोणा या नद्यांचे जल असलेल्या पाच कलशांचे पुजन करण्यात आले. जल जागृतीसाठी जलरथ तयार करण्यात आला असून हा रथ जिल्हाभर फिरणार आहे. जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रथाचा शुभारंभ केला.
सप्ताहभर विविध कार्यक्रम राबविले जाणार असून दि. 17 मार्च रोजी विविध प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील गावात कार्यशाळा, चर्चासत्र व सभा घेतल्या जातील. दि. 18 मार्च रोजी पाणीवापर संस्थांसाठी कार्यशाळा होईल. दि. 19 मार्च रोजी जिल्हा व तालुकास्तरावर जलजागृती मॅराथॉन काढण्यात येईल. दि. 21 मार्च रोजी पांढरकवडा येथे पाणी वापर संस्थांसाठी कार्यशाळा व दि. 22 मार्च रोजी पाणीवापर संस्थांच्या पदाधिकारी व महिला मेळावा घेतला जाणार असून या दिवशी सप्ताहाचा समारोप होईल.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.