BREAKING NEWS

Thursday, March 16, 2017

काँग्रेस-राष्ट्रवादीची स्टेट बॅंकेवर धडक, हक्कभंगाचा इशारा


स्टेट बॅंकेच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांची माफी मागावी! – विखे पाटील




मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – शेतकरी कर्जमाफीसंदर्भात स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांनी केलेले विधान शेतकऱ्यांचा अवमान आणि कायदेमंडळाच्या अधिकारांचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांची माफी मागावी; अन्यथा विधानसभेत हक्कभंग आणण्याचा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.



स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा भट्टाचार्य यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज दुपारी बॅंकेच्या मुख्यालयावर धडक दिली. विधानभवनातून निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आमदार सहभागी झाले होते. विरोधी पक्षांचे आमदार मुख्यालयात पोहोचले तेव्हा बॅंकेच्या अध्यक्षा उपस्थित नव्हत्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी अरुंधती भट्टाचार्य यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीसंदर्भात स्टेट बॅंकेच्या अध्यक्षांनी दिलेले निवेदन निषेधार्ह आहे. अरूंधती भट्टाचार्य देशाच्या किंवा राज्याच्या ‘पॉलिसी मेकर’ नाहीत. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्याचा अधिकार कायदेमंडळाचा आहे. या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न स्टेट बॅंकेच्या अध्यक्षांनी केला आहे. त्या केवळ एक लोकसेवक आहेत. त्यांनी लोकसेवकच रहावे. शेतकऱ्यांच्या मालक होण्याचा प्रयत्न करू नये, असाही इशारा विखे पाटील यांनी दिला. अरूंधती भट्टाचार्यांनी देशाची आर्थिक शिस्त कायम ठेवण्याबाबत केलेल्या सूचनांचा समाचार घेताना विरोधी पक्षनेते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशात कर्जमाफी करण्याची घोषणा केली, तेव्हा स्टेट बॅंकेच्या अध्यक्षा गप्प बसल्या. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना भट्टाचार्यांना आर्थिक शिस्त का आठवली? असा प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केला. धाडस असेल तर त्यांनी कर्जमाफी न करण्यासंदर्भात आपली मते पंतप्रधानांना कळवावी, असे आव्हानही विरोधी पक्षनेत्यांनी दिले आहे. नेमक्या शेतकरी कर्जमाफीच्या वेळीच आर्थिक शिस्तीचा बागुलबुवा उभा करू पाहणाऱ्या याच अरूंधती भट्टाचार्यांच्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने कर्जबुडव्या विजय मल्ल्यासह असंख्य धनदांडग्या उद्योगपतींची सुमारे 1 लाख 40 हजार कोटींची कर्जे ‘राइट ऑफ’ केली आहेत, याकडेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.