मुंबई/ वार्ताहर /--
भिवंडीतील कोनगाव येथे अनधिकृतरित्या सुरू असलेल्या बांधकामाविरोधात बातमी प्रसिद्ध केली म्हणून तेथील चवताळलेल्या भूमाफीयांनी ‘इनाडू इंडिया’ या न्यूज पोर्टलचे पत्रकार सिद्धार्थ कांबळे यांना त्याच्या घरात शिरून शिवीगाळ व धक्काबुक्की केली असून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असा की, ‘इनाडू इंडिया’ या न्यूज पोर्टलचे पत्रकार सिद्धार्थ कांबळे हे भिवंडीतील कोनगाव येथे राहणारे असून त्यांच्या परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात काही दिवसापूर्वी त्यांनी एक बातमी प्रसिद्ध केली होती. आपल्या विरोधात बामत्या प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून तेथे राहणारी नुर निशा खलील शेख ही तिचा पती खलील शेख, त्याच परिसरातील सुनिल म्हात्रे कॉम्प्लेक्समध्ये राहणारी तिची आई, तिचे भाऊ अश्पाक व जाकीर हे सगळेजण हातात धारदार शस्त्र घेऊन 5 जून च्या रात्री 10.15 च्या सुमारास पत्रकार सिद्धार्थ यांच्या घरासमोर आले. ‘आमच्याविरोधात बातम्या का छापल्या?’ असे विचारून या जमावाने पत्रकार सिद्धार्थ कांबळे यांना जातीवाचक व अश्लिल शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करून, ‘तु आमच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध करतोस म्हणून तुला तुझ्या कुटूंबियांसह मारूनच टाकू’, अशी धमकीही सिद्धार्थ यांना दिली. तु या परिसरात राहण्याच्या लायक नाहीस. तु जयभीमची औलाद स्वतःला काय समजोस, तुझ्यासोबतचे कितीही पत्रकार आणि जयभीमवाले येऊ दे, आम्ही तुला आज मारूनच टाकू असे बोलून पत्रकार सिद्धार्थ यांना त्यांच्या जातीवरूनही अर्वाच्च भाषेत धमकावण्यात आले. हा सर्व प्रकार घडत असताना घरात असलेले कांबळे कुटूंबिय घाबरून गेल्याने सिद्धार्थ यांनी लागलीच कोनगाव पोलिस ठाण्यात व सहाय्यक पोलिस उपायुक्त जोशी यांच्याशी संपर्क करून घटनेची सर्व माहिती दिली. त्यानंतर त्या जमावाने सिद्धार्थ यांच्या घरासमोर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. तेथील आजुबाजूचे रहिवासी व पोलिस उपनिरीक्षक बिडगर हे त्यांच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले असता त्यांच्यासमोरही जमावाने पत्रकार सिद्धार्थ यांना पुन्हा शिवीगाळ केली. याबाबत पत्रकार सिद्धार्थ यांनी त्या जमावाविरोधात कोनगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तिथे सुद्धा त्यांना रात्री १ वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आले. मात्र आरोपी पोलिसांच्या डोळयासमोर असतानादेखील अजुनपर्यंत त्यांना अटक का करण्यात आली नाही असा प्रश्न इमारतीमधील इतर रहीवाशांना पडला आहे.
दरम्यान, एका पत्रकाराला त्याच्या घरासमोर अश्लिल व जातीय शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची दिलेल्या धमकीमुळे समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणी संबंधीत भूमाफीयांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला करणारे हल्लेखोर अजूनही मोकाट फिरत आहेत, पत्रकारांची ही अवस्था आहे तर मग इतर सर्वसामान्य नागरिकांचे काय ? अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
पत्रकार उत्कर्ष समिती व पत्रकार संरक्षण समितीने घटनेचा निषेध करीत असून सिद्धार्थ कांबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल

Post a Comment