| डावीकडून श्री. चंद्रकांत वारघडे, अधिवक्ता श्री. मोहनराव डोंगरे, सर्वश्री पराग गोखले, चैतन्य तागडे आणि आनंद दवे |
हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषदेद्वारे मागणी
पुणे,- अमली पदार्थांचा अपवापर आणि अनैतिक कृत्ये यांमुळे कुप्रसिद्ध ठरलेला आणि गोव्यातून हाकलण्यात आलेला सनबर्न फेस्टिव्हल सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात होत आहे. गोवा शासनाने या फेस्टिव्हलच्या आयोजकांना ३ कोटी रुपयांचा थकवलेला कर भरण्याचा आदेश दिला आहे. असा हा फेस्टिव्हल पुण्यात झाल्यावर आयोजक महाराष्ट्र शासनाचा कर जमा करतील का, याची निश्चिती न करताच शासकीय अधिकार्यांनी या फेस्टिव्हलला अनुमती दिली आहे.
केसनंद गावात ग्रामदेवतेच्या मंदिराजवळच या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे या महोत्सवाला स्थानिकांचा विरोध आहेच, तसेच तेथील भक्तांचाही याला विरोध आहे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी फेस्टिव्हलला जाहीरपणे विरोध केला आहे. एकीकडे व्यसनाधीनतेमुळे तरुण मुलांचे मृत्यू होत असतांना तरुण पिढीला व्यसनाधीनतेकडे वळवणारा आणि संस्कृती भ्रष्ट करणारा हा सनबर्न फेस्टिव्हल रहित झालाच पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे पुणे समन्वयक श्री. पराग गोखले यांनी केली. १६ डिसेंबर या दिवशी पुणे येथील पत्रकार भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे, प्रखर हिंदुत्ववादी अधिवक्ता श्री. मोहनराव डोंगरे, हिंदुत्वनिष्ठ आणि अभ्यासक, तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे, राष्ट्रीय चर्मकार संघाचे अतुल पोटे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे उपस्थित होते.
श्री. पराग गोखले पुढे म्हणाले, फेस्टिव्हलच्या रंगभूमीवर नटराजाची प्रतिकृती ठेवली जाते. तिच्यासमोर सर्वजण अंगविक्षेप करत नाचतात. नटराज म्हणजे शिवाचे रूप असून असे करणे म्हणजे त्याचा अवमानच आहे. स्थानिक गावकर्यांचाही या कार्यक्रमाला विरोध आहे. वाघोली येथे या संदर्भात १५ डिसेंबरला घेण्यात आलेल्या बैठकीत ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी एकमुखाने हा कार्यक्रम होऊ देणार नाही, असे सांगितले आहे.

Post a Comment