मोईन खान /
परभणी /--
शहराच्या पाथरी रोडवरून जाणार्या बायपास अर्थात राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न मार्गी लागला आहे. येणार्या जुलैपर्यंत या रोडचे काम झालेले असेल. तसेच गंगाखेड रोडकडील दुसर्या प्रस्तावीत रिंग (बायपास) रोड साठी लवकरच संबंधीतांची बैठक घेणार असल्याची माहिती आज शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी पत्रकारांना दिली.
शहराच्या बाहेरून जाणार्या रिंग रोडच्या निर्मितीसाठी सर्व पत्रकारांनी पुढाकार घेतला असून या संदर्भात शुक्रवारी दुसरी बैठक पार पडली. त्यानंतर जिल्हाधिकारी महिवाल यांची सर्व पत्रकारांनी भेट घेतली असता त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी कलंत्री हे ही उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी महिवाल म्हणाले, शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग बायपासच्या रूपात वळविण्यात आलेला असून त्याच्या मोजणीचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. विशेष म्हणजे या रस्ता कामासाठी शेतकरी अथवा इतर कोणाचाही विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मोजणी आणि भूसंपादनाचे काम मार्च पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होऊन हा रस्ता पावसाळ्यापूर्वी अर्थात जुलैपर्यंत तयार होईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली.
शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर होत असलेल्या प्रचंड वाहतुकीमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे हा बायपास होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. पत्रकारांनी गेल्या वर्षी उचललेल्या या प्रश्नामुळे रस्त्याचे काम मार्गी लागले होते. परंतु मध्येच हे काम रखडल्याने पुन्हा पत्रकारांना यासाठी निर्णायक लढा उभारावा लागला. त्यातूनच शुक्रवारी जिल्हाधिकार्यांची ही भेट घेण्यात आली. यावेळी पत्रकार दिलीप माने, सुरेश जंपनगीरे, डॉ. धनाजी चव्हाण, गिरीराज भगत, गणेश पांडे, अनिल दाभाडकर, विनोद कापसीकर, पंकज क्षीरसागर, गजानन निशानकर, मोईन खान, लक्ष्मीकांत बनसोडे, प्रकाश साळवे, मोहसीन खान, नजीर खान, बाळासाहेब काळे, मदन कोल्हे आदी उपस्थित होते.

Post a Comment