चांदुर रेल्वे- (शहेजाद खान) -
केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे वाहतुकीचे नियमांबाबत कडक निर्णय घेत असतात. ते वाहतुकीचे नियम अजुनही सख्त करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र त्यांच्याच राज्यातील चांदुर रेल्वे येथील पोलीस प्रशासनाच्या बेजबाबदारपणे वाहतुकीचे नियम वेशीवर लटकवले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शहरात अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला असून वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच कुठे दिसत नाही. काही ठिकाणी तर वाहतूक पोलीस आणि
नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे संबंध इतके मधूर आहेत की, जणूकाही वाहतूक पोलिसांकडून खासगी वाहतूकदारांना कोणताही धोका कधीच होऊ शकणार नाही. त्यामुळे एकेका मारूती व्हॅन किंवा कालीपीलीमध्ये तब्बल १५-२० प्रवासी म्हणजेच प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक प्रवासी बसवून प्रवाशांची वाहतूक होताना दिसते. अशा प्रकारच्या वाहनांना कधी एखादा
अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते. नंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होते.
अशातच नियमानुसार बस स्थानक परीसराच्या २०० मीटर अंतरावर कुठलेही खाजगी वाहन उभे करता येत नाही तसेच येथुन प्रवासी वाहतुक सुध्दा करता येता नाही. मात्र चांदुर रेल्वे पोलीसांच्या आशिर्वादाने शहरातील बस स्थानकाला खासगी प्रवासी वाहतुकदारांचा गराडा पडलेला राहात असल्याने या वाहतुकदारांचे दलाल बस स्थानकातून प्रवासी पळविण्याचेही काम करतात. मात्र खासगी प्रवासी वाहतूक ही तितकीच धोकादायकही आहे. बस चालकावर जबाबदारीचे ओझे असल्याने सुरक्षितपणे बस चालविण्यास त्यांच्याकडून प्राधान्य दिले जाते. याउलट खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिवसातून अधिकाधिक फेऱ्या करून कमाई करावयाची असल्याने त्यांच्याकडून वाहन चालविताना सुरक्षिततेऐवजी वेगाला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. चांदुर रेल्वे- अमरावती, चांदुर रेल्वे- कुऱ्हा, चांदुर रेल्वे- धामणगाव रेल्वे या मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठलेला दिसत आहे. वाहनांमध्ये प्रवासी अक्षरश: कोबून भरलेले असतात. परिसरातील आठवडी बाजार किंवा लग्नसराईत तर खासगी प्रवासी वाहतूकदारांची चांदीच चांदी असते. तसेच व्हॅन या चक्क घरगुती वापरण्यात येणाऱ्या एलपीजी गैसवर चालविण्यात येते. शहरातुन ३० मारूती व्हॅनने चांदुर- अमरावती मार्गावर याशिवाय धामणगाव मार्गावर १५, देवगाव मार्गावर १०, तिवसा मार्गावर ७-८ व मालखेड मार्गावर जवळपास १२ मारूती व्हॅन, कालीपीली, मेटाडोरने अवैद्य प्रवासी वाहतुक दररोज होते. अशी धोकादायक वाहतूक पोलिसांच्या देखत होत असतानाही त्यांच्याविरूध्द कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. पोलीस खात्यातीलच एका इमानदार कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, चांदुर रेल्वे- अमरावती मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक मारूती व्हॅनकडुन महिन्याला ७ हजार रूपये वसुल करण्यात येते. यामध्ये चांदुर रेल्वे पोलीसांना १५०० रूपये, ग्रामिण वाहतुक पोलीस ५०० रूपये, फ्रेजरपुरा अमरावती पोलीसांना २००० रूपये, सिटी कोतवाली अमरावती पोलीसांना १५०० रूपये व राजापेठ अमरावती पोलीसांना १५०० रूपये म्हणजे प्रत्येक व्हॅन चालकाला ७ हजार रूपये पोलीसांना महिन्याकाठी द्यावे लागते. एकुन ३० व्हॅन म्हटले की सर्व पोलीस स्टेशन मिळुन २ लाख १० हजार रूपये महिण्याला वसुल करण्यात येते. व याच पोलीसांच्या आश्रयाने व्हॅन चालक कोणाचीही भिती न बाळगता बिनधास्तपणे अवैद्य प्रवासी वाहतुक करतात. यासोबच इतरही मार्गावरसुध्दा अवैद्य वाहतुक करतांना कालीपीली, मेटाडोर, व्हॅन चालकांना चांदुर रेल्वे पोलीसांना महिणा द्यावा लागतो. हा ठराविक ‘महिना’ दिल्यावर कारवाईपासून मुक्तता होत असल्याची चर्चा आहे. यामध्ये उच्च अधिकाऱ्यापासुन ते साधा पोलीसही शामील असल्याचे समजते. महिना थकल्यावर मात्र पोलिसांकडून कारवाई होते. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एखाद्या वाहनास अपघात झाल्यावर या विषयाचा गवगवा होत असल्याने वाहतूक पोलिसांना काही दिवस कारवाई करणे भाग पडते. इमानदार वरीष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे शहरात तपासणी मोहीम सुरू केल्यास अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीस आळा बसू शकेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तसेच ग्रामिण पोलीस अधिक्षकांनी याकडे लक्ष देवून दोषी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणे सुध्दा गरजेचे आहे..
Wednesday, January 11, 2017
पोलीसांच्या आशिर्वादाने अवैद्य प्रवासी वाहतुकदारांची दमदार बॅटींग
Posted by vidarbha on 7:25:00 PM in चांदुर रेल्वे- (शहेजाद खान) - | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment