सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार, सरस्वती समाज कार्य महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक उध्दव जमधाडे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, संविधानाच्या माध्यमातून देशात न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुत्व स्थापित करण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या विचाराच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी जिल्ह्यात दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2017 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासोहब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सामाजिक समता सप्ताह अंतर्गत सर्व संबधीत विभागावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ते विभाग याशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2017 या कालावधीत सामाजिक समता सप्ताहामध्ये आयोजित कार्यक्रमाची रुपरेषा, कार्यक्रमाचे स्वरुप व कार्यक्रमाचा उद्देश व या विषयी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती केदार यांनी प्राताविकातून माहिती दिली.या सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचा लाभ सर्व मान्यवरांना होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहु महाराज, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाली. या प्रसंगी समाज कल्याण विभागाचे अधिकारी , कर्मचारी, श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील व श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक कर्मचारी, पत्रकार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्राध्यापक अतुल राऊत तर आभार प्राध्यापक वसंत रोठोड यांनी मानले.
Post a Comment