BREAKING NEWS

Sunday, January 22, 2017

निवडणुका निर्भय वातावरणात पार पडणार - विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता

यवतमाळ-जिल्ह्यात पदवीधर आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात येत आहे. या निवडणुका निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात आली आहे. यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून या दोन्ही निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडतील, अशी माहिती विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी दिली.



जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे निवडणुकीशी संबंधित यंत्रणेची त्यांनी बैठक घेतली. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक विजयसिंह जाधव, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.
श्री. गुप्ता म्हणाले, जिल्ह्यातील काही भाग निवडणुकीच्या दृष्टीने संवेदनशिल आहे. त्यामुळे या भागाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्रामुख्याने पालिका क्षेत्रातील राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आता ग्रामीण भागात प्रचार करतील. त्यांच्या उपस्थितीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकेल, अशांवर आतापासून प्रतिबंधात्मक कारवाई करावी. निवडणुकांमध्ये अवैध मार्गाचा अवंलब होऊ शकत असल्यामुळे अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे. प्रामुख्याने शासन ज्या उपाययोजना करते, त्याच्यापेक्षा वेगळा प्रकार उमेदवारांकडून होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिस, जिल्हा प्रशासन आणि सर्व यंत्रणेने सतर्कतेने काम करण्याची गरज आहे. 
निवडणुकांमध्ये पैसा आणि मद्याच्या वापरासोबचत धार्मिक कारणावरून सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे धार्मिक स्थळांवर लक्ष केंद्रीत करावे. पैसा ज्या ठिकाणाहून प्रामुख्याने शहरी भागातून जात असल्याने त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहतुकीच्या साधनांवर लक्ष केंद्रीत करावे. कायद्याचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने निवडणूक यंत्रणा कार्यान्वीत करण्यात यावी. पदवीधरची निवडणूक ही पारंपरीक पद्धतीने बॅलेट पेपर वापरून होणार असून जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक ईव्हीएम मशिनवर होणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी स्थानिक निरीक्षण महत्त्वाचे असून सर्व यंत्रणांनी सक्षमपणे कार्य करणे गरजेचे आहे. या निवडणुकीत सर्वच उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. त्यामुळे वेळेवर धावपळ थांबविण्यासाठी उमेदवारांनी आधीच अर्ज करावेत, उमेदवार ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी मदत केंद्र स्थापन करावे, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रशिक्षण देणे आदी उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
यावेळच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवाराने द्यावयाच्या शपथपत्रामध्ये बदल करण्यात आला आहे. आयोगाने दिलेले शपथपत्र त्याला सादर करावे लागणार आहे. तसेच उमदेवारांची माहिती मतदानकेंद्राबाहेर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच नोंदणीकृत पक्षांना समान चिन्ह वाटप करण्याची प्रकिया उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर करावयाची आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी या सर्व बाबींचा अभ्यास ठेवणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वनक्षेत्र अधिक आहे. त्यामुळे वन खात्याच्या अधिकाऱ्यांची निवडणुकीच्या कामी मदत घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सूचविले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.