Saturday, April 8, 2017
आसूड यात्रेत मोर्शी तालुक्यातील हजारो शेतकरी होणार सहभागी ! -' नागपूर ते वडनगर ' आसूड यात्रा ११ एप्रिलपासून !
Posted by vidarbha on 10:30:00 AM in | Comments : 0
स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी तातडीने लागू करा, शेतमालावरील निर्यात बंदी हटवा, शेतकर्यांना कर्जमुक्त करा, अपंग आणि विधवांना ५ हजार रुपये प्रतिमाह मानधन द्या तसेच माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा विविध मागण्यांसह शेतकरी, शेतमजूर, विधवा, सैनिक व दिव्यांगांची नागपूर ते वडनगर 'आसूड यात्रा' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून सुरू होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावात पोहोचणार असल्याची माहिती बळीराजा संत्रा उत्पादक संस्थेचे अध्यक्ष रुपेश वाळके यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यवतमाळ येथे 'चाय पे चर्चा' करताना शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५0 टक्के नफा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येताच सुप्रीम कोर्टातील याचिका क्रमांक ३७६/११ मध्ये ६ फेब्रुवारी २0१५ रोजी दाखल केलेल्या शपथपत्रात उत्पादन खर्च अधिक ५0 टक्के नफा देणार नाही, असे नमूद केले असून, हा देशातील शेतकरी आणि मतदारांचा मोठा विश्वासघात आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षात असताना सोयाबीनला ६ हजार रुपयांची मागणी करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मात्र ३ हजार रुपये भाव देतात. त्यामुळे या सत्ताधार्यांना यात्रेच्या माध्यमातून त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देणार असल्याचे रुपेश वाळके यांनी सांगितले . कस्तुरचंद पार्क येथे ११ एप्रिल रोजी सकाळी १0 वाजता सर्व शेतकरी जमा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या 'देवगिरी' निवासस्थानापासून आसूड यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, धुळे, नंदुरबार, सूरत, अहमदाबाद आदी जिल्ह्यांतून प्रवास करीत वडनगर या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गावात पोहोचणारआहे. पंतप्रधान मोदींनी काम केलेल्या 'चहा कॅन्टीन'समोर २१ एप्रिल रोजी १,000 विधवा महिला आणि शेतकरी कार्यकर्ते रक्तदान करून सरकारच्या निष्क्रिय धोरणामुळे आत्महत्या केलेल्या ३ लाख ५0 हजार शेतकर्यांना श्रद्धानजली वाहणार आहे . राज्य सरकारच्या अधिकार्यांनी अभ्यास केल्यानंतर केंद्र सरकारकडे कापसाला ७४८५ रुपये हमीभाव देण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ४१६0 रुपये एवढाच भाव जाहीर करण्यात आला. याउलट बाजारभाव मात्र कमीआहे. त्याचप्रमाणे धानाला ३ हजार रुपये हमीभाव देण्याची शिफारस केंद्राकडे करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात केवळ १४१0 रुपये भाव जाहीर करण्यात आला. म्हणजेच कापसावर एकरी १0 हजार रुपये आणि हेक्टरी २५ हजार रुपयांची लूट सरकार शेतकर्यांची करत आहे. यावरून सरकार लूटते जास्त आणि देते कमी, असा आरोप मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे . यावेळी मोर्शी तालुक्यातील नईम खान नगरसेवक , बळीराजा संत्रा उत्पादक संस्थेचे अध्यक्ष रुपेश वाळके , राजू हटकर , विलास ठाकरे , सतीश बोरेकर , प्रताप तायडे , बंडू बेलखडे , प्रवीण तट्टे , यादव पवार , जावेद खान , जावेद पटेल , विजय पचारे , कृनाल धलवार , मोहिब खान , शादत पठाण , समीर विघे , उमेश भिंगारे , यासह शेतकरी उपस्थित होते .
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment