यवतमाळ-
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी महसूल भवन येथे विविध विषयांचा आढावा घेतला. त्यात आरोग्य, वन आधारीत रोजगार, कृषि, पेसा कायदा, कर्ज पुरवठा, शेतकरी आत्महत्या व बळीराजा चेतना अभियानाचा समावेश आहे.
बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपवनसंरक्षक विजय हिंगे, वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॅा.बांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.के.झेड.राठोड, जिल्हा शल्य चिकित्स्क डॅा.टी.जी.धोटे, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गायनर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील वैद्यकीय व्यवस्थेचा आढावा घेतांना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयांमध्ये डॅाक्टरांनी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी बाह्य रूग्णांची संख्या अधिक आहे. आणि तेथे दोन वैद्यकीय अधिकारी पदे मंजुर आहे तेथे दोघांचीही नियुक्ती करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या.
वैद्यकीय महाविद्यालयात ग्रामीण भागातून रूग्ण येत असतात. परंतु वेळेत डॅाक्टर्स उपस्थित राहत नसल्याची तक्रार असते. डॅाक्टरांनी वेळेवर उपस्थित राहून दुपारी नियोजित वेळेपर्यंत रूग्ण तपासले पाहिजे. वरिष्ठ डॅाक्टर रूग्ण तपासत नसल्याचे निदर्शनास आले असून या वरिष्ठांनी नियमित रूग्ण तपासणीचे काम करावे व तशा त्यांना सुचना द्याव्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी डॅा.बांगळे यांना दिले.
पेसा कायद्यांतर्गत असणारी गावे व त्या गावांना असलेल्या अधिकारांबाबत स्वतंत्र प्रशिक्षण घेण्याची सुचना त्यांनी केली. वनौपजांतून ग्रामीण नागरीकांना रोजगार व उत्पन्न कसे उपलब्ध होतील, त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी बॅंक अधिकाऱ्यांकडून विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लिंक करण्याच्या सुचना देण्यासोबतच कर्ज वितरणाचा आढावा त्यांनी घेतला.
Post a Comment